प्रिय नैना,
विज्ञानात शिकायला मिळाले होते की जीवन मार्ग शोधून घेते. त्याला अडवले तरीही ते नेटाने आपला मार्ग शोधून घेते. या तत्वाचा वापर जीवनाला आकार देण्यासाठी लोकांनी केला. जेव्हा एक व्यक्ती रोज बायसेप्स चा व्यायाम करून पेशींना त्रास देतो तेव्हा त्या पेशी त्या त्रासाला सहन करण्यासाठी सिद्ध होतात आणि मग तो त्रास त्रास राहत नाही, आणि या प्रकारात सिद्ध होतांना ते बायसेप्स दर्शनीय होतात.
घोटेदार बाहू सुंदर दिसतात, पण त्यांच्यासाठी मेहनत करावी लागते. व्यायाम न करणाऱ्यांचे बाहू जिवंत नसतात का? खरे नसतात का? असतात की पण बलिष्ट बाहू पण जिवंत असतात आणि ते बाहू धारण करणाऱ्याने केलेल्या मेहनतीची ग्वाही पण देतात.
मला वाटते की व्यक्त होण्याची उर्मी म्हणजेच जीवन पण त्या व्यक्त होण्याला काही अनुशासन लावले तर ते व्यक्त होणे लयबद्ध होते, तालबद्ध होते, छंदबद्ध होते. छंदाविना व्यक्त होणे खोटे नाही ते ही जीवनच आहे पण जर मला कुणी छंदात व्यक्त होताना दिसला तर मला त्याचा आदर वाटतो. काही अनुशासन काही त्रास त्या व्यक्तीने जाणीवपूर्वक स्वीकारला हे त्यातून समजते.
असो. रोहिणी आता माझ्याकडे पाहते, तिच्या पाहण्यात आता नेम असतो. ते पाहणे माझ्यावर स्थिरावते काही क्षण. ते क्षण मखमली वाटतात. असे वाटते काळ त्या तिथेच थांबावा आणि तिने मान दुसरीकडे वळवूच नये. आपल्या मनात जे चाललेय तसेच काहीसे तिच्या मनात चालावे हे माझे स्वप्न जणू साकार होते आहे. हा योगायोग कसा असेल. कदाचित माझी इच्छा तितकीच प्रबळ असेल नाही का? आयुष्य खूप सुंदर आहे ग नैना.
भाग्य खुलले
(कालावग छंद, उदा: अंबा पिकतो, रस गळतो)
भाग्य खुलले
क्षण जुळले
एकदा वळून तिने, मागे पाहिले
गहिवरलो
मनी हसलो
आनंदाच्या सागरात, पुरा बुडलो
मला कळले
तिला कळले
नजरेत नजरेने धागे जुळले
रोज भरती
सुख हे किती
झोप नाही चित्त वेडे जागल्या राती
~ रोहित
आपल्या कवितेला नाव असावे आणि खाली आपले नाव असावे असे वाटले आज आणि तसेच करायचे ठरवले आहे. जो कालावग छंद या कवितेत वापरला आहे त्याचे नाव सुद्धा माझ्या संदर्भासाठी कवितेच्या नावाखाली लिहायचे ठरवले आहे म्हणजे ती कविता वाचताना सहज त्या छंदाचा ठेका घेता येतो.
आजच्या कवितेचा छंद कुठे मिळाला, अगं तेच पद्यप्रकाश अजून काय, आणि आंबा पिकतो हे मी सुद्धा लहानपणी ऐकले आहे कितीदा.
(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
१५ आगस्ट २०१३, ११:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com
परफेक्टच कविता लिहिलीय कालावग छंदातील
ReplyDelete