Thursday, October 15, 2015

पान ७३. गुड मार्निंग


प्रिय नैना,

माझ्या आयुष्यातला फुलपाखरांचा काळ सुरू झालेला आहे.  सकाळी सकाळी सगळ्यात पहिले फोनवर गुड मार्निंग मेसेज पाठवल्या शिवाय आणि तिचे आलेले उत्तर वाचल्याशिवाय दिवस सुरूच होत नाही आजकाल.  या व्हाटसॅप मुळे असे वाटते की आपण दूर असूनही जोडलेले आहोत. 

आज सकाळी सकाळी उठल्यावर सहज (म्हणजे अगदीच सहज हा) मी तिच्या फेसबुक प्रोफाईल वर गेलो आणि पाहतो तर काय तिचा प्रोफाईल स्टेटस होता - कमिटेड.  वाव, हे तर मी पण अजून केलेले नव्हते.  काहीच न बोलता किती काय काय करून आणि बोलून जातात या मुली.  मी तिला विचारणार होतो की मी कमिटेड स्टेटस करू का?  आणि इथे तर आधीच आम्ही सगळे करून मोकळे.  पण हो मी कमिटेड आहे हे सांगायला खरेच समोरच्याला विचारायची गरज ती काय नाही का?  मूर्खच आहे मी.  आजपासून आपलाही फेसबुक स्टेटस - कमिटेड आहे गं.  मज्जा येतेय.

मेसेजेस मधे मी तिला वाढदिवस विचारला होता आणि तो २८ ऑक्टोबर ला आहे हे कळताच डोक्यात एकदम घंटा वाजली, अरे हा तर याच महिन्यात येतोय.  ढिंकाचिका म्हणजे आपल्याला रो.. चा वाढदिवस लवकरच साजरा करता येणार.  तुला सांगतो किती टेंशन आले आहे की इतक्या कमी दिवसात तिच्यासाठी काय काय करू आणि काय नाही असे झाले आहे.  अगं एकच आठवडा राहिला की गं. 

जाता जाता अजून एक, पान ३७ वर मी तुला ते गाई पाण्यावर कवितेच्या चालीवर कविता लिहिलेली दाखवली होती ना आणि तिचा छंद कोणता हे माहित नाही म्हटलो होतो, त्या छंदाची माहिती मिळाली बरं.  कुठे माहिताय का?  तुषार जोशी, या फेसबुक मित्राने एक poetry-study-group [१] नावाचा मेलींग लिस्ट गट सुरू केलाय.  तिथे कुणीही कवितेबद्दल तिच्या रचनेबद्दल वृत्तांबद्दल काहीही प्रश्न विचारू शकते आणि उत्तरे द्यायला अनेक जाणकार मंडळी त्या गटात आहेत.  तिथे प्रश्न विचारला काल आणि लगेच तिन चार उत्तरे आली की गं.  काय काय आयडिया काढतात लोक नाही.  तर मिळालेली माहिती अशी की.. त्या १९ मात्रांच्या कविता प्रकाराला दिंडी म्हणतात.

अनेक किर्तनकार आणि संगित नाटककारांना ही जाती प्रिय कविता प्रकार आहे. 

दिंडी = (९ मात्रा + १० मात्रा) = १९ मात्रा, शेवटी दोन गुरू अक्षरे

इंटरनेट क्लाऊड
(जाती: दिंडी)

काय किमया केलीय या ढगाने
धन्य झालो व्हाटसॅप मिळाल्याने
जोडलेले आहोत विना तार
जोडल्याची जाणीव खास फार

कधी वाटे स्माइलीच पाठवावा
आठवल्याचा आणखी पुरावा
रुसुन जावे त्या लाल स्माईलीने
तिने विनवावे फुलाच्या कळीने

हृदय माझं फुलपाखरूच झालं
दिवस जातो ढगात आजकाल
कालीदासाचा मेघदूत होता
स्मार्टफोन झाला दूत तिचा माझा


~ रोहित

(कमिटेड)
रोहित

[१] Poetry Study Group - http://groups.google.com/group/poetry-study-group

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
१६ ऑक्टोबर २०१५, ०८:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Friday, February 13, 2015

पान ७१. अधर


प्रिय नैना,

कालच्या भन्नाट अनुभवानंतर आज पण फेसबुकावर आजच्या दिवसाचे विशेष काही वाचायला मिळते का पाहण्यासाठी 'ओठ', 'अधर', 'किस' वगैरे शोधून पाहिले आणि रत्ने हाती लागली बघ:

काही बाप लोकांचे शेर असे सापडले

व्याकुळ माझ्या नजरेला दे नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या अधराना दे अधर प्राशिण्यासाठी
~ इलाही जमादार

ठेवले मी तयार ओठांना
एकदा तू पुकार ओठांना
--सुरेश भट....

काही कवीनी मागच्या वर्षी याच दिवशी जे  लिहिले ते सापडले

तू खोड ओठांनीच जे लिहिलेस या ओठांवरी
वृतांत भेटीचा मला सगळा लिहावा लागतो !..
~ सुधीर...(मुळीक)

नजरेचे हे कामच नाही म्हणून म्हणतो
ओठ तुझे मी माझ्या ओठांनी शोधावे..!
गोविंद ....(नाईक, १३ फेब्रुवारी २०१४)

नशा उतरण्याआधी अलगद पुन्हा उतरले..
त्या ओठांचे, या ओठांवर जहर गुलाबी...!!
~ सचिन (काकडे, १४ फेब्रुवारी २०१४)

आणि खास आजच्या दिवसासाठी लिहिणारे अनेक कलाकार भेटले त्यातले आवडलेले काही लिहून ठेवतो.

अधरावरती अधिर जाहली गुलाब रेषा
आणिक मौनाची उलगडली हळवी भाषा...
~ पूजा (भडांगे बेळगाव)

या डोळ्यांचा त्या डोळ्यांशी करार आहे...
त्या ओठांचा या ओठांवर थरार आहे...
- यामिनी (दळवी)

धुरकट झाल्या काही ओळी ,ज्या लिहील्या होत्या प्रेमाने
ओळी त्याच पुन्हा ओठांनी ,ये ....ओठावर गिरवू आपण
- स्वाती....(शुक्ल)

जरा, जरा गुलाबी चळवळ असु दे
फक्त ओठ ओठांवर बास होत नाही..!!
- सचिन (काकडे)

उरात सूर ताल भर, सुरेल जीवनास कर
हळूच छेडुदे अधर, तनूस तू सतार कर
~ अरूण (शुभानन चिंचकर)

तुझे लाजण्याचे ऋतू फार झाले,
तसे ओठ माझे निराधार झाले.....
~ अनिल...(आठलेकर)

सांगतो मी गूज माझ्या अंतरीचे
लाव तू ओठांस माझ्या कान आता...!
----प्रशांत (वैद्य)

ओठांनी ओठांवर वाचू...लिहायचे जे
शब्दांना अर्थाची घुसमट कळते कोठे?
- मनोज (दासुरी)

अता काढू कशाने पांढ-या पेशीतली मरगळ
तुझ्या तांबूस ओठांचा उतारा दे पुन्हा बोलू ..!!
~ सतीश (दराडे)

सांडते साखर मुखातुन, गोडवा शब्दात त्याच्या...
कैफ, धुंदी, दंश, बाधा, अन उतारा, ओठ त्याचे...!

- पूजा (फाटे)

आणि आजची विशेष बातमी म्हणजे हा खालचा व्हॉटसॅप चा संवाद:

मी: १४ च्या भेटीबद्दल तू सांगणार होतीस ना?
ती: आमच्या घरी एका कार्यक्रमाला जाण्याचे सुरू होते रे म्हणून नक्की काही होत नव्हते
मी: मग आता उद्याच १४ आहे ना, काय नक्की झाले मग
ती: तो कार्यक्रम रद्द झाला
मी: म्हणजे आपली भेट होऊ शकते ना?
ती: हो
मी: मग लवकर सांगायचे नाही का, किती तो सस्पेन्स
ती: (स्मायली)
मी: तू दुष्ट आहेस
ती: (स्मायली)
मी: दात काढणारी दुष्ट
पुन्हा मी: अजून एक विचारायचे होते
ती: काय
मी: उद्या तू एकटीच आलीस तर मला आवडेल, तुझी ती मैत्रीण जी मागच्या वेळेला आली होती तिला आणले नाही तर मला जास्त आवडेल
ती: अरे तिला अजून कुणालातरी भेटायला जायचे आहे
मी: (मनातच.. हुश्श)
मी (प्रकटपणे): सहा वाजता, फुटाळा [१] च्या सुरवातीला हं,
ती: बरं, तसा मेसेज करेन तुला निघाले की
मी: थॅंक्स, आज मी खूप आनंदात आहे
ती: (स्मायली) गुड नाईट मला आता टिव्हीत लागलेला सिनेमा पाहायचाय, चल बाय
मी: ओके

तर मग या संवादातून तुला कळलेच असेल की माझा ढिंका चिका प्लान पक्का झाला आहे.  उद्या तिला (पुन्हा) मनातले सांगणार आहे.  जे पत्रातून ;लिहिले होते तेच पण आता त्यानंतर आमचे बरेच बोलणे आणि पत्र लिहिणे झाले आहे त्यामुळे आता हे विचारणे काही तरी वेगळे असणार आहे असे वाटते आहे.  आणि तिने चक्क १४ तारखेला भेटशील का विचारल्यावर हो म्हटले यातच तिच्या मनातले कळते ना गं.  काय?

अमित ला सांगितल्याबरोबर महाराज पार्टी ची डिमांड करू लागले. त्याला सांगितले गप बास, आधी भेट होऊ तर दे, (मनातले) काही कळू तर दे, मग लेका तुला पाहिजे तेवढ्या पार्ट्या देईन मी. 

गुपित
(जाति: अनलज्वाला - [ | प | प | प ] )

बोट ठेवले फोटोमधल्या अधरांवरती
गोड शहारा फुलला रंध्रा रंध्रांवरती
भासहि मोहक आठव दाहक तव श्वासांचा
विचारही तो मादक हळव्या सहवासाचा

स्वप्न पाहिले तुला आपली जे म्हणण्याचे
गुपित उद्याच्या भेटित आहे त्या स्वप्नाचे
दिवस साजरा व्हावा आहे उत्कट आशा
तुझ्या मुखातुन हो यावे इतकी अभिलाषा

~ रोहित

(हुरळलेला)
रोहित

[१] फुटाळा, नागपुरातला एक तलाव ज्याला आमच्या नागपुरात नागपुरचा नरिमन पाईँट म्हटले जाते.  तो तरूण तरूणींचा स्वर्ग आहे, तिथे संध्याकाळी चौपाटी सारखी जत्रा असते पण सगळे आपल्या आपल्यात मस्त असतात.

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
१३ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Thursday, February 12, 2015

पान ७०. प्रामिस


प्रिय नैना,

टेडी दिवसाला शारदा जनरल स्टोर्स मधे एक फेरफटका मारून आलो, त्याला विचारले एखादा छोटासा टेडी असलेली की चेन मिळेल का तेव्हा त्याने एक सुंदर शी टेडी असलेली की चेन दाखवली, ती विकत घेऊन स्वतःजवळच ठेवून घेतली.  खरे म्हणजे रोहिणी साठी घेतलेली पण तिला काय कारण सांगून देणार?  आणि तिने घेतली नाही तर?  तेव्हा ती पण १४ तारखेलाच देता आली तर बघुया म्हणून स्वतःजवळ ठेवून दिली.

कालच्या प्रामिस दिवसाचे प्रामिस मी स्वतःजवळच स्वतः केले आहे.  ते म्हणजे तुला रोज काही ना काही सांगणार, रोज एक पत्र तुला लिहिणार. अगदी नेमाने, शप्पथ.  बघच तू.

आजचा मिठी दिवस, आला ते खूप गोड स्वप्न घेऊन.  आज चक्क रोहिणी आपल्या मिठीत आहे असे स्वप्न पडलेले आणि ते उठल्यावर लक्षात राहिलेले म्हणजे पहाटेचे स्वप्न असणार नाही का?  पहाटेची स्वप्ने खरी होतात हे वाक्य मला आज खूप आवडायला लागले आहे, काय सुंदर म्हटले आहे ज्याने कुणी म्हटलेय. 

फेसबुकावर मिठीची मस्त धुमधाम सुरू आहे आज 'मिठी' शब्द जरी सर्च केला तरी मिठीची बरसात होते डोळ्यांपुढे.  त्यातले आवडलेले काही असे:

फेसबुकावरचे भन्नाट कवी अनिल आठलेकरांच्या वॉल वर:

सखे आज थोडा अबोला धरूया,
मिठीतच मुक्याने जरा मोहरूया...
~ अनिल आठलेकर

वा वा अनिल सर काय मनातले बोललात.  ते ओळींच्या पुढचे टिंब टिंब सुद्धा पोचले बघा माझ्या पर्यंत.  त्या टिंबांचेच रहस्य उलगडे पर्यत जिवाची घालमेल सुरूच राहणार.  टिंबांमधेही किती खोल अर्थ भरलेला असतो नाही, कवीला तो दिसतो बरोबर.

यामिनी दळवी या मालाड च्या कवयित्रीच्या भिंतीवर:

तुझ्या मिठीतली उब कैवल्याच्या गावी नेते...
तुझे चांदण आभाळ माझ्या धरणीला भेटे..!!
~ यामिनी

क्या बात है.  आणि अशी बात जेव्हा एक मुलगी लिहिते तेव्हा आपल्यालाच फुलून आल्यासारखे वाटते बुवा.  सिनेमात हे चांदणं पाहून पाहून थकलोय बुवा आता,  आपल्याही नशीबात असे चांदणे कधी येणार आहे, लवकर येऊ दे रे बाबा.

एकीकडे स्वाती शुक्ल यांच्या भिंतीवर

तुझे श्वास रेंगाळले रोमरोमी
मिठी सैल झाली तरी धुंद होते
~ स्वाती

सतीश दराडे यांनी मिठीतली वेगळी बाजू दाखवली आहे

एक उपरी मिठी मारल्यासारखे
दु:खही भेटते पाहुण्यासारखे...
~ सतीश

ममता सिंधूताई त्यांच्या हळव्या स्टाईल मधे

झुलावे असे जर कधी वाटले..
मिठी दे तुझी त्या झुल्यावर नको.!
~ ममता

प्रशांत वैद्य मिठी चे वैशिष्ठ्य सांगतात

अशी असावी मिठी तुझी की
मी व्हावे तू...! तू...माझ्यामय...!
~ प्रशांत

वा वा असे सगळे वाचून मी अगदी मिठीमय होऊन गेलोय आता.  माझ्या स्वप्नातली परी माझ्या मिठीत केव्हा येणार हे अजूनच छळायला लागलेय.  यालाच विरह म्हणतात का?  प्रेम कबूल करायच्या ही आधी विरह होऊ शकतो का?  काय का असेना आत्ता असे वाटतेय की एक मिठी पाहिजे बुवा सर्व काही विसरायला लावणारी.

चल गं मला १४ तारखेसाठी खूप तयारी करायची आहे.  रोहिणी ने अजून नक्की भेटण्याची तयारी दाखवलेली नाही पण जुजबी हो म्हणालीये तिला कसे पटवायचे की भेटणे खूप महत्वाचे आहे त्याची तयारी.  आणि ती १४ ला भेटेल; त्या दिवशी काय काय बोलायचे त्याची तयारी.  केवढे टेंशन आलेय काय सांगू तुला.  या अश्या गोश्र्टींसाथी कुठे गाईड किंवा २१ अपेक्षित सुद्धा मिळत नाही नाहीतर मी ते आधी घेतले असते. 

बरे हो ते माझे प्रामिस म्हणजे अगदीच पक्के प्रामिस आहे बरं. रोज तुला एक पत्र नक्की म्हणजे नक्की ठरले हं. 

मराठी कविता समुहावर 'सखे कसे सांग तुला' अशी ओळ सुचवली आहे आणि ती माझ्या मनात काल पासून पिंगा घालतेय. 

सखे कसे सांग तुला
(अष्टाक्षरी - पादाकुलक छंद)

सखे कसे सांग तुला
मनातले सांगायचे
हदयाला तुझ्या, तुझ्या
पासूनच मागायचे

ठरवून कितीतरी
शब्द पाठवले मागे
तुझ्या समोर येताच
चित्त वेड्या परी वागे
हरवती पुन्हा पुन्हा
शब्द कसे आणायचे

ठरवले आहे उद्या
सांगायचे, होवो काही
विरहात जळायचे
आता झुरायचे नाही
तुझ्या वर सारे जग
ओवाळून टाकायचे

(कटीबद्ध)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
१२ फेब्रुवारी २०१५, २०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Monday, February 9, 2015

पान ६९. अशी गोड तू


प्रिय नैना,

ते संत वॅलेंटाईन का कोण होऊन गेले ते हा सध्याचा चालू आठवडा म्हणजे अनेक जणांना स्वप्नपूर्तीची पर्वणी आणि अनेकांना जिवाला घोर देऊन गेलेत.  मागच्या वर्षी जे स्वप्न पाहिले होते ते या वर्षी रहस्य होऊन समोर उभे राहील याची कल्पना नव्हती.  आता एक एक दिवस जगताना प्रत्येक दिवसाचा उत्सव होतोय आणि त्यातही रोज काहीतरी वेगळे करून आमच्या मनातली परी सुद्धा छळ छळ छळतेय तुला काय सांगू.

पण त्याही आधी, इथे या वॅलेंटाईन आठवड्याच्या दिवसांचे वैशिष्ठ्य क्रमवार लिहून ठेवतो कसे (इंटरनेट चा गुगलदेव चिरायू होवो)

७ फेब्रुवारी २०१५ - गुलाब दिवस - आम्ही आपले व्हाटसॅप वरच गुलाब पाठवले, त्याला स्माईली उत्तर आले होते
८ फेब्रुवारी २०१५ - प्रपोज दिवस - हे यावर्षी नाही बरं, म्हणून आम्ही या दिवशी गप्प होतो
९ फेब्रुवारी २०१५ - चॉकलेट दिवस - या आजच्या दिवसाबद्दल खाली खूप खूप लिहायचे आहे तेव्हा या यादीत नको
१० फेब्रुवारी २०१५ - टेडी दिवस - या दिवशी काय होत बघुया
११ फेब्रुवारी २०१५ - प्रामिस दिवस - या ही दिवशी काय होते बघुया
१२ फेब्रुवारी २०१५ - मिठी दिवस - (हे सध्या स्वप्नातच)
१३ फेब्रुवारी २०१५ - किस दिवस - (हे पण सध्या स्वप्नातच)
१४ फेब्रुवारी २०१५ - वॅलेंटाईन दिवस - क्लाईमॅक्स चा दिवस गं आमचा या वर्षी

हा पूर्ण आठवडा म्हणजे रोज काही ना काही छळ करायचा चंग बांधून येतोय माहिताय.  आज सकाळी उठत नाही तर रोहिणी च्या फेसबुक प्रोफाईल चित्र पाहून श्वास थांबला.  अजूनही मी दीर्घ श्वासच घेतोय बघ.  काय ठरवून ती रोज काही ना काही सूचक पोस्ट करते आहे म्हणून सांगू तुला.  आजचा फोटो म्हणजे कहर कहर अगदी.  म्हणजे 'ओम शांती ओम' मधे जसा 'शांती' ला पाहून तो 'ओम' शुद्ध हरवून पडतो तसाच मी पडतोय असा मला भास झालेला.  या एका फोटो साठी मी आयुष्य कुर्बान करायला तयार आहे.  आपण नेहमीच जिला बघतो तिच्यात असे अजून किती किती वार शिल्लक आहेत कोण जाणे, पण सध्या या वॅलेंटाईन आठवड्यात रोज घायाळ व्हायची तरतूद करण्यात येतेय तिकडून. 

कविता समुहावर 'निरज कुलकर्णी' यांनी लिहिलेली एक खास कविता आवर्जून आणि सतत सतत आठवत राहीली आज.  ऑरकुट बंद झाल्यामुळे कुठेच सापडत नव्हती मला एका साईट वर या काही ओळी सापडल्या आहेत.  काही गोष्टी सर्व काही अर्पण कराव्या इतक्या महान असतात, त्यातलीच ही एक कविता आहे आणि तिचा आजचा फोटो पण त्यातलाच आहे आज.

फुलांनी पुन्हा चूर लाजून व्हावे, अशी गोड तू
निशेने नव्या मंद गंधात न्हावे, अशी गोड तू...

सदा व्हायची धुंद राधा जशी पाहुनी श्रीधरा,
हरीने तसे धुंद होऊन जावे, अशी गोड तू...

अशी तारकांनी असूया करावी तुला पाहता;
सदा चंद्र-सूर्यात संवाद व्हावे अशी गोड तू...

ढगांनी झुलावे, हळूवार यावे, तुझ्या अंगणी;
नभाने तुझ्या उंबर्‍याशी झुरावे, अशी गोड तू...

जणू आळवावी पहाटे पहाटे कुणी भैरवी,
दवाने उन्हालाच ओले करावे, अशी गोड तू

जसे चातकाला मिळावे जरा थेंब मेघातले,
मनाचे समाधान आकंठ व्हावे, अशी गोड तू...

तहानेत ज्या बालकाने किती आसवे वाहिली,
तुला पाहता त्या मुलाने हसावे, अशी गोड तू...

यमाला कसा प्राण माझा मिळे, मी तुला जिंकता;
अता श्वास माझे चिरायू बनावे, अशी गोड तू...

असे मेघ काळे झपाटून जावे, तुला पाहुनी;
इथे पावसाळे सुगंधी बनावे, अशी गोड तू...

कसे काय सांगू कसा गुंतलो मी, तुझ्या प्राक्तनी;
अनावर्त ज्योतिष्य दिग्मूढ व्हावे, अशी गोड तू...

शहाणा म्हणा की, म्हणा आज झालोय, वेडा खुळा;
स्वतःला सखे मी अता विस्मरावे, अशी गोड तू...

सये लाघवी हास्य येता तुझ्या, मुग्ध ओठांवरी;
पुन्हा आज सौदामिनीने रुसावे, अशी गोड तू...

तुझे मूल्य जाणून झाले, अचंबीत ब्रम्हांड हे;
कुबेरासही, मी भिकारी गणावे, अशी गोड तू...

कधीही, कुठेही, कसेही, कुणी नाव घेता तुझे;
पुन्हा या जगाने मला आठवावे, अशी गोड तू...

मला स्पर्श साधा, तुझा भासतो, ’अमृता’च्यासवे;
’तुला मी कसे बाहुपाशात घ्यावे?’ अशी गोड तू...

कशाला असे मांडतो मी तुला व्यर्थ शब्दांतुनी?
तुला रेखिण्या जन्म संपून जावे, अशी गोड तू..

~ निरज कुलकर्णी

(मंत्रमुग्ध)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
०९ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Tuesday, February 3, 2015

पान ६८. सखी

प्रिय नैना,

माझी तळटीपा द्यायची सवय कशी वाटली.  हो म्हणजे अजून तिला सवय म्हणायसाठी तसे अजून काही वेळा करावे लागणार आहे पण मला हे खूप आवडले आहे हं.  कालच्या पानावर मी ज्या तळटीपा दिल्या त्या मला खूपच आवडल्या आहेत.  चालू संदर्भाचा ओघ न घालवता अधिक माहिती टिपून ठेवण्यासाठी ही पद्धत खूपच छान आहे.  दुसऱ्यांदा किंवा नंतर वाचताना त्या टिपा वाचायला मजा येते आणि अधिक माहिती पण साठवून थेवता येते.  बरं असो.

आज धम्माल झाली.  कापा झोन [१] मधे आम्हा तिघांची भेट ठरली आणि घडली.  मी, अमित आणि रोहिणी (म्हणजे तिच्या बरोबर एक तिची मैत्रीण पण आलेली पण मी तिला मोजत नाहीये).  व्हॉटसॅप वर भेटूया का असे बोलणे सुरू होते तेव्हाच मी शक्कल काढली की आजच भेटूया का?  कापा झोन नावाचे नवे हॉटेल उघडले आहे ते छान आहे म्हणतात. त्यावर धाड घालूया का?  आणि चक्क अमित आणि रोहिणी देखील तयार झाले.  आज ती पांढरा सलवार कमीज घालून आली होती.  तिने कानात मोत्यांचे डूल घातले होते, त्या पांढऱ्या ड्रेस वर ते मोत्यांचे डूल इतके खुलून दिसत होते की मी बराच वेळा त्यांना पाहताना पकडल्या जातो की काय असे वाटले होते मला. 

बोलता बोलता विषय निघाला एका नव्या जाहिरातीचा.  सध्या फेसबुकवर आणि अनेक जागांवर एक जाहिरात फिरते आहे.  त्यात तरूण मुलीला जेवणाच्या टेबल वर रुसलेले बघून आजोबा त्यांच्या वेळेसच्या कहाण्या सांगू लागतात, बाबांना किती जणींनी नाही म्हटले, काकाला किती जणी सोडून गेल्या आणि त्यात आजीही जोडते की आजोबांच्या आयुष्यात किती मुली तिच्या आधी आल्या आणि गेल्या.  मग मुलगी हसायला लागते आणि घरचे सगळे मिळून खेळीमेळीत हसू लागतात.  मी माझे मत मांडले की आजकाल प्रेम किती तकलादू दाखवले जाते.  ब्रेकप होतो याचाच अर्थ प्रेम तकलादू होते असा नाही का?

रोहिणी चे मत असे होते की ते प्रेम असते असे म्हणायलाच नको.  कुणीतरी आवडते म्हणून त्याच्याबरोबर काही काळ घालवून मैत्री पेक्षा जास्त काहीतरी समजून घ्यावे पण त्याला प्रेम म्हणून नये.  प्रेम काही काळानंतरही ती व्यक्ती सहन होत असेल तर त्या नात्यात येते असे समजावे.  तसे झाले नाही तर थांबावे आणि पुढे जावे move on.  तिच्या म्हणण्या प्रमाणे मुळात माझे तुझ्यावर प्रेम आहे हे जो काही तासात किंवा कधीही न भेटता कुणाला म्हणतो ते प्रेम नसते.  असूच शकत नाही.  आवड असते, आकर्षण असते असे म्हणूया की.  आकर्षण हा शब्द वाईट का वाटायला हवा, ते स्वीकार करून त्या आकर्षणाचे रूपांतर प्रेमात करता येते का ते बघावे.

माझ्या मनातल्या प्लुटानिक प्रेमाच्या [२] तिने चिंध्याच केल्या बोलता बोलता.  मी पण म्हणालोच की कुणाला जर मनापासून आपले कुणावर प्रेम जडले आहे हे पटले असेल तर?  त्यावर तिचे उत्तर ठरलेले होतेच की असे म्हणणारा स्वतःलाच फसवत असतो.  मला नाही पटले.  असे असते तर माझे रोहिणीवरचे प्रेम खोटेच ठरते ना?  एक मला पटले की जे ब्रेकप होते ते प्रेम असू शकत नाही. पण ब्रेकप च्या आधी ती दोघे त्याला प्रेमच म्हणत असतात ना?  काय भुगा होतोय डोक्याचा, ही रोहिणी म्हणजे तापच आहे विचारांचा.  पण एक मात्र मला नक्की माहित आहे की मला तिच्या बद्दल जी ओढ वाटते ते निव्वळ आकर्षण नाही.  हो म्हणजे अगदीच नाही कसे म्हणणार ना, ती दिसतेच इतकी कातिल की आकर्षण असणारच पण फक्त तेवढेच नाही.  त्यात काळजी आहे, त्यात वेड आहे, त्यात तिला हसताना बघायची ओढ आहे, तिला हसताना आणि आनंदात असली की डोळे मिटून वर बघायची सवय आहे ती अदा पुन्हा पुन्हा डोळ्यात साठवायची ओढ त्यात आहे.  फक्त आकर्षण नाही गं.  तिला कसे सांगणार आहे कुणास ठाऊक.

अमित म्हणाला थांबा रे दोघे, बरं ब्रेकप होऊ शकतो आणि त्याचा स्वीकार करावा म्हणजे पुढे जाता येते असेच ना.  मला पण दोच चार ब्रेकप करायचे आहेत.  पण ब्रेकप च्या आधी काही तरी लागते की नाही लोकहो?  आधी ते तर होऊ द्या.  माझे म्हणणे होते असे असे असेल तर ते आधी जे होते त्याला म्हणायचे काय?  पाश्चात्य देशात तर त्याला बायफ्रेंड गर्लफ्रेंड म्हणून मोकळे [३] होतात आणि नंतर ब्रेकप करतात आणि तसे झाले की पुढच्या बॉय किंवा गर्लफ्रेंड च्या शोधात निघतात. आपल्या भारतात ज्या लैला मजनू चे किस्से प्रसिद्ध आहेत त्यात आदर्श असा आहे की एकदा लैला मजनू भेटले की ते आजन्म असलेले नातेच असायला हवे तरच ते महान असते.  त्यांचा आदर्श ठेवून जे घडते ते प्रेम आहे हेच तर आपण म्हणायला जातो आणि मग त्यात ब्रेकप होणे समाविष्ट नसते, किमान आदर्शात तरी नाही. 

हेच, रोहिणी मधे पडली पुन्हा,आपण हे आदर्श बदलायला हवेत.  तिच्या मते मित्र च्या पुढे सखा असा शब्द वापरावा. हे तिने बोलता बोलताच तयार केलेले सिद्धांत आहेत हे कळत होते पण विचार मस्त होता.  बॉयफ्रेंड साठी शब्द 'सखा' मस्त होता.  म्हणजे ती माझी कोण झाली - सखी नाही का.  वा मी मनातल्या मनातच खूष झालो.  हो पण तिच्या म्हणण्या प्रमाणे असा सखा आपले सखेपण हरवू शकतो हे ही आपण लक्षात ठेवायला हवे आणि तसे झाले तर पुन्हा कोण सखा होणार हे शोधायला लागायचे (हे पचवणे अवघड होते, म्हणूनच फक्त ऐकले आणि मनात कुठेतरी ठेवून दिले पुन्हा न बघण्यासाठी). 

त्या सखा सखी वर बरेच विनोद झाले मग.  पण आजची मिळकत आहे तिची ती कल्पना सखा होण्याची.  ती मला तिचा सखा म्हणून कबूल करणार की नाही याची धाकधूक आता लागलेली आहे.  पण येत्या १४ ला कार्डावर तुझा सखा लिहायचेच असे ठरवले लगेच.

सखी
(चाल: सखे कसे सांग तुला)

माझी सखी तूच तुला सांगू कसे सांगू कसे
तुझ्या मुळे झाले माझे जिणे लख्ख सोने जसे

तुझे हसणे भरते माझ्या मधे प्राण नवा
तुला स्मरताच पेटे काळजात एक दिवा
तुझा भास जागोजाग माझे मन वेडे पिसे

तूच सखी तूच सखी नको दुजे कुणी अाता
तुझ्या कडे वळतात सगळ्याच माझ्या वाटा
तुझा सखा होण्यासाठी करू काय करू कसे

~ रोहित

[१] कापा झोन, अभ्यांकर नगर मधे उघडलेले नवे हॉटेल
[२] रविकिरण मंडळाच्या माधव ज्यूलियन यांनी वैचारिक प्रेमाचा पुरस्कार केला होता.  शेक्सपियर ने पण दोन मनांचे मिलन असे लिहून ठेवले आहेच ना
[३] पाहिलेले कितीतरी इंग्रजी सिनेमे हीच शिकवण देतात ना

(मनापासून तिचा सखा)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
०३ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Monday, February 2, 2015

पान ६७. पुन्हा सिद्ध

प्रिय नैना,

कविता करणाऱ्यांचे किती प्रकार असतात तुला माहित आहे.  डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी 'नव्या निर्मिति्रक्रियेची कविता' या शीर्षकाच्या त्यांच्या प्रस्तावनेत पाश्चात्य कवी एझरा पाऊंड यांनी केलेले एक वर्गीकरण दिले आहे ते रोचक आहे.  एझरा पाऊंड म्हणतात की कवी तिन प्रकारचे असतात:

१) नकले कवी
२) युग कवी आणि
३) नवनिर्मितिप्रक्रियाशोधक कवी

बापरे केवढा मोठा शब्द तयार केलाय त्यांनी मराठीत त्याचे भाषांतर करताना नाही.  तर त्या लेखात [१] त्यांनी हे तिनही प्रकार विस्ताराने समजावून सांगितले आहेत.  त्यातले नकले कवी म्हणजे जे कवी प्रसिद्ध आहेत त्यांच्या शैलीचे अनुकरण करून तसेच लिहिल्याने आपणही प्रसिद्ध होऊ अशी भाबडी आशा असणारे कवी  म्हटले आहे.  बरेच काही आहे त्यात पण ते नंतर कधी तरी, मला तर सध्या वेगळ्याच दोन प्रकारचे कवी अधीक डोक्यात येताहेत.

१. कवी ज्यांना कवितांसाठी पुरस्कार मिळतात
२. कवी ज्यांना कवितांसाठी पुरस्कार मिळत नाहीत :)

यामिनी दळवी [२], विजय बेंद्रे [3] आणि आता तर पूजा भडांगे [४] सुद्धा, यांच्या सारखे सदैव पुरस्कार मिळणारे काही कवी सध्या माझ्या फेसबुक यादीत आहेत.  मला प्रचंड हेवा वाटतो या कवींचा.  मस्त थोड्या थोड्या दिवसांनी कुठल्यातरी कवितास्पर्धेत पटकावलेले पारितोषिक आपल्या भिंतीवर छापून जळवत असतात.

रोहिणीचा क्लास संपला पदवी पण झाली, आता तिने एमबीए साठी कालेज जाईन केले आहे.  पण रोज सकाळी जो सोहळा होता तो आता नाही.  आपचे बोलणे होत असते फोन वर, (म्हणजे मीच तिला अनेक वेळा फोन करतो).  मेल मधे, मेसेज मधे आणि व्हॉटसॅप गटावर पण बोलणे होतच असते.  ती कबूल करत नाही पण त्या घटनेनंतर ती माझी काळजी करायला लागली आहे, हे मला कळते सांगितले नाही तरी.  ती, मी आणि अमित असे त्रिकूट झाले आहे.  कधी एकत्र सिसिडीमधे भेटायचा प्लान होतो तेव्हा खूप धमाल येते.

१४ फेब्रुवारी पुन्हा जवळ येतोय. मागच्या १४ फेब्रुवारी ला काय काय मनातच बेत केले होते आठवते का? पण या १४ ला तिला पुन्हा सरळ सरळ थेट विचारायचे ठरवले आहे.  तिने आधी धुडकावून लावले असले तरीही मैत्री कायम ठेवली आहे आणि त्यामुळेच यावेळेस आपल्याला पुन्हा चांस आहे हे मी समजून घेतले आहे काय?

या १४ ला…
(मुक्तयमक)

तुझ्या मुळे माझ्या जगण्याला दिशा वेगळी मिळते
स्वतःसही विसरून कसे आनंद जगावे कळते
तू असलीस की रंगुन जातो क्षण क्षण मोहक बनतो
या १४ ला पुन्हा एकदा तुला विचारिन म्हणतो

तू म्हणजे उत्तर जगण्याचे तू म्हणजेच प्रयोजन
व्याकुळलेल्या वृक्षासाठी तू वळिवाचे सिंचन
हो म्हणशील तू या आशेने कितेक स्वप्ने विणतो
या १४ ला पुन्हा एकदा तुला विचारिन म्हणतो

~ रोहित

(पुन्हा सिद्ध)
रोहित

संदर्भ:
[१] समीक्षेची वल्कले, द. भि. कुलकर्णी, पद्मगंधा प्रकाशन, २००८
[२] https://www.facebook.com/yamini.dalvi.9
[३] https://www.facebook.com/vijay.bendre.52
[४] https://www.facebook.com/miss.puju

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
०२ फेब्रुवारी २०१५, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

Sunday, February 1, 2015

पान ६६. चिडलेला

प्रिय नैना,

आता आमचे सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरू झाले आहेत.  ३ ते ४ महिने लागले बरे व्हायला आणि हिंडू फिरू लागायला.  आधी कदाचित समाजव्यवस्था तयार होण्या आधी प्रत्येक माणसाला, कुटुंबप्रमुखाला स्वतःच्या घराची सुरक्षा स्वतःच करावी लागत असेल तेव्हा सर्व शक्ती लढणे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणे यातच लावली जात असेल.

नंतर समाजव्यवस्था आल्या आणि कामांची वाटणी आली.  शहरीकरण आले आणि अधिक टप्पेदार कामांची विभागणी आली.  आता प्रत्येक व्यक्तीला तलवार बंदूक हातात घ्यायची गरज उरत नाही.  प्रत्येक व्यक्ती तिला हवे ते काम करते, जसे नोकरी, व्यवसाय आणि ते करता करता एक मोठी रक्कम 'कर' म्हणून सरकारात जमा करते आणि या करातून शहराची सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छता व्यवस्था व्हावी म्हणून सरकारात अधिकारी आणि प्रतिनिधी नेमले जातात.  हे सगळे नागरिकशास्त्र फक्त कागदावरच असते का गं?

मला न कुणाला वेठीस धरता आले न कुणाला जाब विचारता आला.  माझ्या घरावर बळजबरीने हल्ला झाला, आम्ही सगळे जखमी झालो मरता मरता वाचलो पण त्या डरोडेखोरांचा तपास करणे आणि मला न्याय देणे हे कुणाचेच कर्तव्य नसल्यासारखे सगळे जणू परत कामाला लागलेले दिसतात.  मी नशीबाला का दोष देऊ, आपली यंत्रणा का काम करू शकत नाही?  मग मी इतका मोठा 'कर' का भरायचा?  कधी कधी नक्षल लोकांचा राग बरोबर आहे असे वाटायला लागते.  त्यांनाही या व्यवस्थेवर विश्वास राहिलेला नाही.

तुला सांगतो मला सध्या खूप चीड येतेय, आपण फसवल्या गेलोय असे सतत वाटत राहते.  ज्या क्षणी मला या व्यवस्थेची या सुरक्षेची खरी गरज होती तेव्हा ते काहीच करताना दिसत नाहीत.  आणि मी कुणाला जाऊन जाब देखील विचारू शकत नाही.  कधी कधी तर सगळे दुरून आपल्याकडे बघून हसताहेत असे वाटू लागते.  मजा बघताहेत असे वाटू लागते. 

जाती प्रकाराचा विचार सुरू केला खरा पण ते छंदांसारखे सोपे नाही असे दिसते.  छंदात मला जसा ठेका धरता येतो आहे, छंद पाहून त्याचा ठेका लक्षात आला की त्या ठेक्यावर लिहिणे पथकन जमते तसेच या जाती प्रकाराचा ठेका अजून डोक्यात भिनणे झालेले दिसत नाही.

छंदात कसे एक अक्षर म्हणजे नेहमी दीर्घ उच्चार तेव्हा [ प | ] म्हटले की चार अक्षरात काम निभते पण जाती मधे [ प | ] चा अर्थ होतो आठ मात्रा, आणि अक्षरे कमी अधीक चालतात पण त्यांची मात्राबेरीज आठ हवी असे लागते. 

चंद्रकांत किंवा पतीतपावन छंद मला खूप आवडला होता तो होता
[ | प | प | प | - ] आक्षरे १३

त्याची आता पतीतपावन जाती लिहायची म्हणजे
[ | प | प | प | + ] २६ मात्रा (८, ८, ८, २)
या जातीतले एखाचे गाणे गुणगुणायला मिळते का बघतो आहे म्हणजे त्या ठेक्यावर काही लिहिता येईल.

सध्या संतापाने इतके डोके भिणभिणते आहे की धड विचार करता येत नाहीये, सतत वाटत राहते की पुन्हा असेच संकट येणार नाही कशावरून आणि तेव्हा कोण आहे आपली सुरक्षा करायला?  हे शहर ही न्यायव्यवस्था, हे पोलीस सगळे कुचकामाचे निघाले, एखादे खेळणे आवडले नाही तर आपण लगेल चांगले नाही म्हणून बदलून घेतो, हे शहर ही व्यवस्था कुठे जाऊन बदलू?

(हतबल)
रोहित

(रोहितची डायरी / तुष्की नागपुरी)
२१ मार्च २०१४, २२:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com