Sunday, September 15, 2013

पान २५. पद्मानंद


प्रिय नैना,

आज मनात विचारांची रांग आहे.  गर्दी नाही बरं कारण वेगवेगळे असले तरीही ते विचार महत्वाचे आहेत.  काही आनंदी करणारे आहे, काही खट्टू करणारे तर काही हळवे करणारे.  एकेक सांगतो.

माधवराव पटवर्धन, तेच जे स्वतःला माधब जूलियन टोपण नावाने संबोधतात, त्यांचे 'पद्यप्रकाश' वाचून मी किती हुरळलो होतो हे मागच्या पानांवर कळलेच असेल, त्यांचा खरा प्रबंध 'छंदोरचना' मिळाला मराठी कविता समुहाच्या पानांमधे, https://www.facebook.com/groups/marathikavitasamooh/421131151255834/  खरेच या माणसाने मेहनत घेतली आहे आणि त्याची दाद द्यावीच लागेल.  यांच्या कविता कश्या असतील याची उत्सुकता होती म्हणून 'विदर्भ साहित्य संघाच्या' ग्रंथालयातून (या ग्रंथालयाचा मी आता सभासद झालोय, वो कहानी फिर सही) माधव जूलियन यांचे गज्जलांजली हे पुस्तक घेऊन आलो.  माझे नशीब म्हणजे या पुस्तकावर त्यांचे हस्ताक्षर आहे माहिताय!  तर या पुस्तकाला चाळून मन खट्टू झाले.  एकही कविता अशी नाही मिळाली जी मनात पोचेल, आवडेल.  एकच कविता ओळखीची असलेने (ऐकली असलेने) जरा बरी वाटली ती म्हणजे प्रेमस्वरून आई.  आता जुन्या प्रकारची मराठी वाचायची सवय आणि आवड नसलेने पण असे झाले असेल पण जे मला मंगेश पाडगावकर किंवा कुसुमाग्रज यांच्या कवितेतून मिळाले ते या कवितांमधे मिळाले नाही, ही जनरेशन गॅप आहे का कुणास ठाऊक.  गम्मत म्हणजे यांच्या पुस्तकात प्रत्येक कवितेत वृत्ताची अनेक जागांवर सूट घेतलेली दिसली आणि ते पण रूचले नाही.  कदाचित यांच्या कवितांवर फार कुठे वाचायला मिळत नाही याचेही कारण हेच असावे का? 

दुसरे आणि खूप आनंदाचे कारण म्हणजे माझे आवडते कवी 'मंगेश पाडगावकर' ज्यांचे बोलगाणी घेऊन मी  काही पाने आधीच नाचलो आहे त्यांना 'पद्मभूषण' पुरस्कार जाहिर झाल्याची बातमी.  आपल्याला आवडलेला कवी सर्वांना आवडतो हे कळणे म्हणजे आनंदाची वृद्धीच नाही का?  आपण नकळत ज्यांना गुरू स्थानी ठेवले ते व्यक्तीमत्व देशाने मान्य केले आहे हे पाहून तर आपल्याला हे भेटले हे आपलेच भाग्य असे वाटते.  :)

जाता जाता हुरहिर लावणारी गोष्ट, म्हणजे 'तुमको देखा तो ये खयाल आया' हे गाणे ही गझल सुरू होती रेडियोसिटी वर आणि ती ऐकण्याचा अनुभव कसा असतो हे मी कसे सांगू गं शब्दात?  हे गाणे आपल्यासाठीच 'जावेद अख्तर' साहेबांनी लिहिलेय आणि आपल्यासाठीच 'जगजीत सिंग' यांनी गायलेय असे वाटावे इतके मनाला जाऊन भिडते, प्रत्येक वेळेस ते ऐकले की.  सध्या मनात जाऊन बसलेल्या एका खास व्यक्तीमुळे तर असे गाणे लागले की काय सांगू काय होते.

जावेद साहेबांचे शब्द असतात
जगजीत साहेबांचे स्वर आणि ताल
गीत हृदयात भरायला लागते तेव्हा
गतीशून्य होतो आयुष्यकाल

तुझे चित्र आपोआप समोर येते
माझे अस्तित्व हळूहळू विरघळत जाते
जावेद, जगजीत इतकेच काय स्वतःलाही
तुझ्या आठवणीत विसरायला होते

मग उरतात तुझे डोळे तुझे स्मित
मग उरतात तुझ्याच विचारांचे गंध
मग उरतात तू असून नसल्याच्या वेदना
यालाच म्हणत असावेत समाधीचा आनंद


पद्मानंदित,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२७ जानेवारी २०१३, २१:३०
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment