Sunday, September 15, 2013

पान. २२ शेवटी


प्रिय नैना,

कालची (पान २१ वरची) कविता सहा ओळींची लिहायची म्हणून  ७, ७, ८, ७ अश्या अक्षरांच्या ओळींची झाली, आणि तिला आता कोणता छंद म्हणायचे हे कोडे पडले.  कसेही असले तरीही ती कविता म्हणायला एक ठेका धरता येतो.  ७ अक्षरांच्या ओळीत शेवटच्या अक्षरावर विलंबीत स्वर घेतला तर मस्त नाद तयार होतो.  अजून एक गम्मत सांगू माधवरावांनी म्हटलेला वैकुंठ छंद आहे ना त्या त्यांनी प्रत्येक दोन ओळीत सयमक दाखवले होते आणि मी आज एक कविता लिहिली त्यात २ आणि ४ थ्या ओळीवर यमक आणून पाहिले.  आता याला पण वैकुंठ छंदच म्हणावे लागेल कारण अक्षरे तशीच आहेत प्रत्येक ओळीत ४ ४ ! ३ ३. 

पहाटेचे कोळे उन, वाटते वेगळे
सकाळचा चहा आता, वाटतो वेगळा
तेच तेच तरी सारे, नवेच वाटते
अचानक बघा कसा, झालोय वेंधळा

कोंदट घर कोनाडे, सुगंधी वाटती
काय जादू झाली झाले, जगणे निराळे
नळातून पाणी येते, रोजच्या सारखे
तरी वाटे अमृतच, घरात खळाळे

आजकाल धुंदीतच, चालतो वागतो
दोस्त म्हणे गेला बेटा, हातून सुटला
घडी घडी उगाचच, गालात हासतो
कोण जाणे काय रोग, जडला कुठला

मला झाली बाधा काय, सांगावे कुणाला
मनातच आनंदतो, मनात ठेवतो
तरी पण तिचे चित्र, दिसते लोकांना
गुंतलेला जीव कुठे, लपून राहतो

कुसुमाग्रजांनी मुक्तायन आणि महावृक्ष सारखे कवितासंग्रह लिहून मुक्त कविता किती सशक्त असू शकते याची अनेक उदाहरणे आपल्यासाठी ठेवली आहेत.  कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दी निमित्ताने त्यांची काही पुस्तके चाळायची संधी मिळाली हे माझे भाग्यच होते.  'महावृक्ष' कविता शब्दाशब्दागणिक एक भव्य चित्र निर्माण करत जाते आणि शेवटी कडेलोट करावा तसे भानावर आणते.  मुक्त कविता लिहिणे म्हणजे छंदबद्ध कविता लिहिण्यापेक्षाही कठीण आहे हे जाणवू लागले आहे.  मुक्त कवितेत साथीला छंद, ताल किंवा समान ओळींची रचना काहिच नसते, यमकाचेही बंधन नसल्याने जो काही प्रभाव साधायचा आहे तो निव्वळ तुमच्या कल्पनेत तुमच्या कंन्सेप्ट मधे असावा लागतो.  मी पण मुक्त कविता लिहावी असे खूप वाटत होते आणि आज अचानक एका क्षणी ही कविता मनाच्या फांदिवर येऊन बसली.  मी रात्रभर तिच्या नशेतच राहणार आहे हे तुला वेगळे सांगायला नकोच.

शेवटी त्याला कळले!
त्याचे अस्तित्व पार धोक्यात आलेले आहे.
ज्या फांद्यांवर पानांवर;
घट्ट पकड मिळवून,
त्याने स्वतःचे राज्य स्थापन केले.
अंधाराचे सण,
ज्यांच्या सह साजरे केले रडून.
त्या फांद्या तीच पाने;
कशाच्यातरी विलक्षण प्रभावाने,
त्याच्याकडे लक्ष देईनाशी झाली आहेत.
श्वास गुदमरायला लागला त्याचा.
त्याने शेवटचेच म्हणून...
गलबलाट केला;
थयथयाट करून प्रकट होण्याची चेष्टा केली.
पुन्हा पुन्हा सर्वदूर..
करून पाहिला स्वतःचा नाद भरण्याचा प्रयत्न.
पण..
त्याची सत्ता संपलीये!
हे कळायला त्याला फार वेळ लागला नाही.
शेवटी...
काल जेव्हा..
ती माझ्याकडे पाहून गो S ड हसली.
तेव्हाच सहन न होउन;
मन दगडाचे करून...
माझ्या एकटेपणाने,
गळफास लावून जीव दिला.

मुक्तपक्षी,
तुझा, रोहित

(रोहितची डायरी / तुष्की, नागपूर)
२८ फेब्रुवारी २०१२, १०:००
+९१-९८२२२-२०३६५
tusharvjoshi [at] gmail [dot] com

No comments:

Post a Comment